आकुर्डी, पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय वर्तुळात आमच्याबाबत जाणीवपूर्वक पसरवण्यात येत असलेल्या अफवांचे आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचे आम्ही जाहीर खंडन करत आहोत. भारतीय जनता पक्षातून आमची हकालपट्टी झालेली नसून, आम्ही स्वाभिमानाने आणि विचारधारेला स्मरून ३० डिसेंबर रोजीच शिवसेनेत प्रवेश केला आहे, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेचे उमेदवार चेतन गौतम बेंद्रे आणि समीर दिलीप जावळकर यांनी मांडली आहे.
खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा प्रवेश सोहळा ३० डिसेंबर रोजी पार पडला होता. हा निर्णय कोणत्याही बाह्य दबावाखाली न घेता, केवळ जनसेवा आणि विकासाच्या मुद्द्यावर घेतला गेला आहे.
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली – चेतन बेंद्रे
याविषयी बोलताना चेतन बेंद्रे म्हणाले की, “विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या बातम्या म्हणजे त्यांच्या पराभवाची चाहूल आहे. यावेळी जनतेने आम्हाला कौल देण्याचे निश्चित केले आहे, हा वाढता जनविश्वास पाहून विरोधक बिथरले आहेत. शहरात अनेक मोठ्या नेत्यांनी भाजप सोडून इतर पक्षात प्रवेश केला, तेव्हा अशी ‘हकालपट्टी’ची भाषा वापरली गेली नाही. मग आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांबाबतच अशी बातमी पेरण्याची गरज का पडली? यातच आमचे यश आणि विरोधकांची भीती दडली आहे.”
जनतेचा विश्वास आणि विकासकामांवर भर – समीर जावळकर
समीर जावळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “आम्ही शिवसेनेच्या विचारधारेवर ठाम असून, प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. विरोधकांनी कितीही अफवा पसरवल्या तरी जनतेचा आमच्यावर आणि आमच्या कामावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही नकारात्मक राजकारण न करता, केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढत आहोत.”
यावेळी दोन्ही उमेदवारांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, विरोधकांच्या या खोट्या प्रचाराला आणि अफवांना बळी न पडता, प्रत्यक्ष काम आणि स्वच्छ चारित्र्याच्या पाठीशी उभे राहावे.













