पिंपरी – “रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांनी बहुजनांच्या शिक्षणाद्वारे रयतेचा पाया मजबूत केला. पारंपरिक शिक्षणाबरोबरच उद्योजकीय शिक्षणाची गरज अधोरेखित करून त्यांनी ‘कमवा आणि शिका’ योजनेचे बीज पेरले, जे आज जगभर अंगीकारले गेले आहे,” असे प्रतिपादन पंढरपूर येथील युवा उद्योजक मा. शशिकांत कराळे यांनी केले.

महात्मा फुले महाविद्यालय, नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आणि कन्या विद्यालय, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या प्रसंगी रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, साताऱ्याचे माजी चेअरमन मा. साहेबराव पवार यांनी कर्मवीर अण्णांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या निर्भय व्यक्तिमत्वाविषयी भाष्य केले. दुर्गम भागातील गरीब रयतेच्या झोपडीत अण्णांनी केलेल्या शिक्षणप्रसाराचा उल्लेख करत, आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) युगात शिक्षकांनी स्वतःचे SWOC Analysis करून स्मार्ट होण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. संजोगजी वाघेरे पाटील यांनी “रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील आघाडीची संस्था असून तिच्या तोडीस तोड दुसरी कोणतीच संस्था नाही. येथे शिकलेले विद्यार्थी आज उच्च पदांवर कार्यरत राहून समाजाला दिशा देत आहेत,” असे सांगत व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रास्ताविक व स्वागत महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पांडुरंग भोसले यांनी केले. कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुवर्णा परदेशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सांगवी येथील उद्योजक मा. विजय कामठे व त्यांची पत्नी प्रमिला कामठे, माजी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते संजय गायके, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देणाऱ्या श्रीमती काकडे मॅडम, प्रा. माने सर, नाणेकर सर, यशवंत गायकवाड सर आणि सात देशांचे सायकल भ्रमण करणारे श्री. चोफे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला मा. भाऊसाहेब वाघेरे, श्री. नाणेकर, वाणिज्य विद्याशाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. सुहास निंबाळकर, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्रा. डॉ. दत्तात्रय हिंगणे, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्य प्रा. डॉ. संगीता अहिवळे, कला शाखेच्या उपप्राचार्य प्रा. डॉ. कामायनी सुर्वे, IQAC समन्वयक डॉ. नीलकंठ डहाळे, सांस्कृतिक समिती प्रमुख डॉ. शुभदा लोंढे, प्रा. रुपाली जाधव, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संग्राम गोसावी आणि प्रा. अनुप्रिया प्रभू यांनी केले. तर आभार प्रदर्शन नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक अश्रफ पठाण यांनी केले.
कर्मवीर जयंती सप्ताहानिमित्त महात्मा फुले महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समितीच्या वतीने निबंध, प्रश्नमंजुषा आणि पोस्टर स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते.













