तळेगाव येथील बीएड महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
तळेगाव, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तळेगाव दाभाडे येथील स्नेहवर्धक मंडळ सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्ट बीएड कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘शब्दवेध: भाषा आणि विचार’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, स्नेहवर्धक मंडळ सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत शेटे, सचिव किशोर राजस, खजिनदार सुनील कडोलकर, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पल्लवी वर्तक यांच्या हस्ते या विशेषांकाचे प्रकाशन झाले.
‘शब्दवेध : भाषा आणि विचार’ हा विशेषांक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पल्लवी वर्तक, सहायक प्राध्यापक शीतल महाले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. मराठी भाषेची उत्पत्ती, तिचा आजवरचा प्रवास, एआय मध्ये मराठीचे स्थान, राष्ट्रीय शिक्षण धोरणात स्थानिक भाषेचा सहभाग आणि दिलेले महत्व तसेच इतर विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे लेखन केले. मराठी भाषेची विविधांगाने मांडणी या विशेषांकात केली आहे.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ. संभाजी मलघे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणात प्रादेशिक भाषांना अधिक महत्व दिले गेले आहे. यापुढे सर्व शाखांमधील शिक्षण मातृभाषेतून देण्यात येणार आहे. अनेक अभ्यासक्रमांतील संदर्भग्रंथ मराठीमध्ये आणण्यासाठी शासन आणि इतर अनेक संस्था काम करत आहेत. भाषेचा अडथळा आल्याने अनेकांना आवड असलेल्या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेऊ शकत नव्हते. त्यामुळे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात हा अडसर दूर केला आहे.
मराठी भाषा दिवसेंदिवस समृद्ध होत आहे. इतर भाषांमधील शब्द मराठीत आले आहेत. त्यामुळे मराठी भाषा नवीन टप्प्यावर आली आहे. भाषा अतिशय समजून घेण्याची गोष्ट आहे. भाषेची ताकद समजून घेत संस्कृती टिकवली पाहिजे. इतर भाषा शिकल्या पाहिजेत. परंतु मातृभाषेला कमी लेखून इतर भाषांना अधिक महत्व देता कामा नये, असे सांगत मलघे यांनी कुसुमाग्रज, विंदा करंदीकर यांच्या विविध कवितांसह त्यांची स्वरचित चिंधी कविता सादर केली.
प्रास्ताविक प्राचार्या डॉ. पल्लवी वर्तक यांनी केले. कुसुमाग्रजांनी मातृभाषेला सन्मान मिळवून दिला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शब्दवेध : भाषा आणि विचार या विशेषांकाबाबत बोलताना त्या म्हणाल्या, यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा आहे. भाषेबद्दलच्या जबाबदारीचे भान आपण जपले पाहिजे. या विशेषांकांच्या निमित्ताने ही जबाबदारी आता अधिक पटीने वाढली आहे. संपादकीय मनोगत सहायक प्रा. शीतल महाले यांनी व्यक्त केले.












