तळेगाव/मावळ, दि.१५ जून २०२५: पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळा परिसरात भीषण दुर्घटना घडली आहे. तळेगाव दाभाडे शहरालगतच्या इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळल्याने मोठा अनर्थ घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत जवळपास २५ ते ३० पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलताना ६ जणांचा मृत्यू झाल्याची दु:खद माहिती दिली आहे. त्यामुळे ही दुर्घटना अतिशय गंभीर स्वरूपाची आहे, हे स्पष्ट झाले आहे.
घटनेनंतर बचाव पथके तत्काळ घटनास्थळी दाखल झाली असून, बचाव आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. नदीच्या पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी अग्निशमन दल, पोलिस, आपत्ती निवारण पथक आणि स्थानिक नागरिकांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे, या दुर्घटनेच्या वेळी पर्यटकांसोबत लहान मुलेही उपस्थित होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली होती. आज रविवार असल्यामुळे अनेक पर्यटक कुंडमळा परिसरात पर्यटनासाठी आले होते. याच दरम्यान नदीवरील जुना पूल अचानक कोसळला आणि ही दुर्दैवी घटना घडली.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि हळहळिचे वातावरण निर्माण झाले असून, मृतांच्या नातेवाइकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली असून, अद्यापही बरेच पर्यटक बेपत्ता असल्याची शक्यता आहे.
सध्या घटनास्थळी उच्चस्तरीय चौकशीचे संकेत दिले जात असून, जुन्या आणि धोकादायक पुलांची पाहणी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.