पुणे, १९ जून २०२५: जाधववाडी लघुपाटबंधारे तलाव सध्या ९४.५३% भरलेला असून, हा तलाव “द्वारविरहित” (Ungated) असल्यामुळे येत्या काही तासांत तो पूर्ण क्षमतेने भरून अनियंत्रित विसर्ग सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसाचा जोर आणि धरण क्षेत्रातील पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांनी अत्यंत महत्त्वाची सूचना जारी करत मौजे जांबवडे, सुदुंबरे, सुदवडी, तसेच देहू ते तुळापूरदरम्यानच्या इंद्रायणी नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
नदीकाठच्या नागरिकांसाठी सूचना:
नदी पात्रालगत जाणे टाळावे.
जनावरे, साहित्य इत्यादी नदीपात्रातून तात्काळ हलवावीत.
भाविक वारकऱ्यांनी इंद्रायणी नदीच्या पात्रात उतरणे टाळावे.
सध्या देहू आणि आळंदी येथे पायी दिंडी सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक जमले आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
संबंधित ग्रामपंचायती, नगरपालिकांबरोबरच पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनालाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नदीकाठच्या सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पुणे पाटबंधारे विभागाने केले आहे.