पिंपरी, प्रभाग क्रमांक 32 -भारतीय संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर सांगवी परिसरातील नागरिकांसाठी हर घर इंटरनेट – हर मन कनेक्ट’ हा एक लोकहिताचा उपक्रम जाहीर करण्यात आला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे युवा शहराध्यक्ष डॉ. धम्मरत्न भाऊ गायकवाड यांनी हा उपक्रम अधिकृतपणे जाहीर केला.
संविधान दिनाचे औचित्य साधत ‘हर घर इंटरनेट – हर मन कनेक्ट’ या नावाने हा प्रकल्प सुरू केला असून, सांगवीला Smart, Digital आणि प्रगत बनवण्याच्या उद्दिष्टाने मोफत Wi-Fi इंटरनेट कनेक्शन आणि फ्री HD TV चॅनल्स सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
डॉ. गायकवाड म्हणाले की, “जनतेच्या हक्कासाठी, जनतेच्या सुविधांसाठी आणि डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने सांगवीतील प्रत्येक घर जोडले जाणार आहे. युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना समान संधी मिळावी हीच संविधानातून मिळालेली समता, न्याय आणि स्वातंत्र्याची खरी प्रेरणा आहे.”
या उपक्रमामुळे सांगवीतील नागरिकांना तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करण्याची संधी मिळणार असून, डिजिटल सबलीकरणाच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.













