रहाटणी,पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रहाटणी–काळेवाडी प्रभाग क्रमांक २७ मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रकांत नखाते यांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. नियोजनबद्ध, सातत्यपूर्ण आणि थेट जनतेशी संवाद साधणाऱ्या प्रचारामुळे नखाते यांच्यासह बाबासाहेब त्रिभुवन, सविता खुळे, अर्चना तापकीर यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

नखाते यांनी प्रचाराच्या माध्यमातून प्रभागातील खड्डेमुक्त रस्ते, नियमित पाणीपुरवठा, प्रभावी ड्रेनेज व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता, वाहतूक कोंडी, पार्किंग समस्या तसेच मूलभूत नागरी सुविधांवर ठोस भूमिका मांडली आहे. “नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न हेच माझे प्राधान्य” असल्याचे ते प्रत्येक भेटीत ठामपणे सांगत आहेत.
केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकास योजनांचा प्रभावी वापर करून प्रभागात अधिक निधी आणणे, रखडलेली कामे पूर्ण करणे आणि नव्या विकासकामांना गती देणे हा नखाते यांचा मुख्य अजेंडा आहे. यामध्ये अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण, पिण्याच्या पाण्याच्या लाईनचे अद्ययावतीकरण, ड्रेनेज लाईन सुधारणा, सार्वजनिक शौचालये, उद्याने आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा यांचा समावेश आहे.

भाजपाच्या संघटित आणि शिस्तबद्ध कार्यकर्त्यांनी प्रचारात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. होम टू होम संपर्क, लघुसभा, स्थानिक नागरिकांसोबत संवाद, सोशल मीडिया व डिजिटल प्रचाराचे प्रभावी नियोजन यामुळे नखाते यांचा संदेश घराघरात पोहोचत आहे. विशेषतः युवकांमध्ये रोजगार व पायाभूत सुविधांबाबत, महिलांमध्ये सुरक्षितता व स्वच्छतेबाबत, तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये आरोग्य व सोयीसुविधांबाबत नखाते यांच्या भूमिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
“राजकारण केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न ठेवता ते सेवाभावाशी जोडणे आवश्यक आहे,” असे सांगत नखाते यांनी पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कामाच्या सातत्यावर भर दिला आहे. यामुळे प्रभागातील सुजाण मतदारांमध्ये त्यांच्या कार्यपद्धतीबाबत विश्वास निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.

एकूणच सध्याची राजकीय परिस्थिती, वाढता जनसमर्थन, नागरी प्रश्नांवर आधारित स्पष्ट दृष्टीकोन आणि प्रभावी प्रचार यामुळे रहाटणी–काळेवाडी प्रभाग क्रमांक २७ मध्ये भाजपाचे चंद्रकांत नखाते विजयाच्या दिशेने भक्कमपणे वाटचाल करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे विजयाची औपचारिकताच शिल्लक असल्याची चर्चा आता नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.













