संत तुकारामनगर, “निवडणुकीपुरते आश्वासन देणं आमचं राजकारण नाही. नागरिकांच्या रोजच्या अडचणी समजून घेऊन त्यावर ठोस उपाय देणं हाच माझा आणि भारतीय जनता पक्षाचा खरा अजेंडा आहे,” असे ठाम मत भाजपचे प्रभाग क्रमांक २० मधील उमेदवार सतीश नागरगोजे यांनी व्यक्त केले.
शहरासाठी जाहीर करण्यात आलेल्या ‘हा आहे वादा!’ या संकल्पनाम्याकडे केवळ घोषणांचा दस्तऐवज म्हणून पाहू नये, तर तो पुढील पाच वर्षांच्या नियोजनाचा आराखडा असल्याचे नागरगोजे यांनी स्पष्ट केले. पत्र्याच्या घरांमध्ये राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मालकी हक्काची घरे देणे, झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करून त्यांना पक्क्या घरांचा लाभ मिळवून देणे, हा या वादानाम्याचा कणा असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक २० मध्ये नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, अनधिकृत बांधकामे आणि वाहतूक समस्यांवर उपाय करण्यासाठी हा संकल्पनामा मार्गदर्शक ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवासी वस्त्यांतील बांधकाम परवाना प्रक्रिया सुलभ करणे, निश्चित कालमर्यादेत परवाने देणे, तसेच जुन्या वस्त्यांच्या पुनर्विकासासाठी राज्य शासनाकडून मंजुरी मिळवण्याचा पाठपुरावा केला जाईल, असेही ते म्हणाले.
आरोग्याच्या दृष्टीने ३० वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष आर्थिक तरतूद, तसेच दिव्यांग नागरिकांसाठी स्वतंत्र रोजगार धोरण राबवण्याचा संकल्प असल्याचे नागरगोजे यांनी नमूद केले. करदात्यांना कर सवलती देणे आणि दीर्घकालीन ताबेदार नागरिकांना मालकी हक्क मिळवून देण्यासाठी सातबारा व प्रॉपर्टी कार्ड नोंदणीचा मार्ग मोकळा करण्यावरही त्यांनी भर दिला.
पर्यावरणाच्या मुद्द्यावर बोलताना, “विकास हवा, पण तो शाश्वत असला पाहिजे,” असे सांगत पुनावळे परिसरात ऑक्सिजन पार्क उभारणी, नदीकाठावरील पूररेषेचे पुनर्सर्वेक्षण आणि सुधारित विकास आराखड्याद्वारे नियोजनबद्ध शहर उभारण्याची भूमिका त्यांनी मांडली.
“हा वादा म्हणजे केवळ पोस्टरवरचा मजकूर नाही, तर नागरिकांसोबत केलेला विश्वासाचा करार आहे. प्रभाग क्रमांक २० चा सर्वांगीण विकास हाच माझा संकल्प आहे,” अशा शब्दांत भाजप उमेदवार सतीश नागरगोजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.













