पिंपरी चिंचवड, दि.१८ जून २०२५: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्यात आल्या असताना शहरातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाचे श्रेय आमच्या पक्षाला व नेत्याला जात असल्याचा दावा अजित पवार व महेश लांडगे यांनी केला.
मंगळवारी सायंकाळी शरद पवार गटाचे अजित गव्हाणे यांच्यासह ३७ माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विकासाचा पाढा वाचताना अजित पवारांनी पुणे,मुंबई, नाशिक-रस्त्याचे विस्तारीकरण, प्राधिकरण, उड्डाणपूल, रिंगरोड, एमआयडीसी, पाणीप्रश्न, घरकुल, आयटी हब आदींची उहापोह करत 25 वर्षात शहराचा चेहरामोहरा बदलून टाकल्याचे सांगितले. तसेच 2017 नंतर सत्तेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याने शहराचा विकास खोळंबला. आपल्याला या शहराला सर्वार्थाने विकसित करण्यासाठी आपली कामे लोकांपर्यंत पोहोचवून पुन्हा सत्ता स्थापन करायची असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात पवारांना प्रत्युत्तर देतांना महेश लांडगे म्हणाले की, शहरातील विकास कामांचे लोकार्पण करत असतांना त्या प्रकल्पांची मान्यता,निविदा दिनांक देखील त्या प्रकल्पाच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात यावे, जेणेकरून लोकांना प्रकल्पाची कामे कोणी केले याबाबत माहिती मिळेल. कारण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते मंडळी प्रकल्पाचे भूमिपूजन करतात, नंतर त्या प्रकल्पाकडे अनेक वर्षे ढुंकूनही बघत नाहीत. आणि जेव्हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊन कामे करतो, तेंव्हा श्रेय घेण्यासाठी तेच लोक पुढे येतात. अशी टीका अजित पवारांवर नाव न घेता महेश लांडगे यानी केली.
तसेच जर कोणी असे करत असेल, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत असेल तर मी पैलवान आहे. अशांना अंगावर घेण्यासाठी नेहमी तयार असतो, असा सूचक इशारा देखील लांडगे यांनी यावेळी दिला.
राज्यात महायुतीचे सरकार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावर आले असताना स्थानिक पातळीवर भाजपा आणि राष्ट्रवादी या दोन्ही गटातील धुसफूस उघडपणे दिसून येते आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही रंगत अधिक वाढणार हे मात्र नक्की.